लॉकडाऊनच्या काळात अनेक अपघाताच्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. उस्मानाबादमध्ये एक शाळकरी मुलगा आणि दोन मुलींचा पाण्याच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच वेळी तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार; उमरगा तालुक्यातील कोळसूरच्या दयानंदनगर तांड्यावरील प्रतीक्षा पवार (१२), ओंकार पवार(१२), अंजली राठोड (१३) अशी तीन मुले गुरुवारी दुपारी रस्त्याने फिरत गेली होती. दरम्यान, शिवारातील रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरुम काढण्यासाठी खोदलेल्या खड्यातील पाण्यामध्ये पडली आणि त्यातच त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती मिळताच उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशीरा रस्त्याचे काम करणारी टीबीआय कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये किसन राठोड यांची भाची प्रतीक्षा मधुकर पवार (१२) ही लॉकडाऊन काळात पुणे येथून गावाकडे आली होती. हिच्यासह ओंकार राजुदास पवार (१२) आणि अंजली संतोष राठोड (१३) हे दोघे तुरोरी इथल्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत होते.
हेही वाचा – कुलरचा शॉक लागून तीन लहान बहिणींचा मृत्यू