राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण राज्यात शाळा सरसकट बंद केल्यामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. शाळा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात आज आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेऊन साधारण आणखीन १५ ते २० दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
नक्की काय म्हणाले राजेश टोपे?
‘शाळेच्याबाबतीत प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामीण भागात जी काही रुग्णांची संख्या वाढत आहे. मराठा, विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन साधारण १५ ते २० दिवस अजून शाळा बंद ठेवण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय व्हावा अशाच पद्धतीचे चर्चेच्या अंती निर्णय झाला आहे. त्याच्यानंतर निरीक्षण करुया, कसा पीक चाललेला आहे. मग शाळेच्या संदर्भातला निर्णय योग्य तो घेण्यात येऊ शकेल,’ असे राजेश टोपे म्हणाले.
तसेच पुढे राजेश टोपे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. याचा अर्थ आलेख कमी होतोय या भ्रमात राहू नये. राज्यात आज ४६ हजार रुग्णांची नोंद होईल. त्यामुळे कोरोना आलेख कमी होतोय असा नाही. महाराष्ट्रातील पॉझिटिव्हिटी रेट २१.४ टक्के आहे, तर मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट २७ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. २ लाख ७५ हजारांच्या दरम्यान राज्यात सक्रीय रुग्ण आहेत. दिलासादायकबाब म्हणजे संख्या वाढत असेल तरी ८६ टक्के रुग्ण होमक्वारंटाईन आहेत.
हेही वाचा – आता Covid Testing Self Kit विक्रीचा रेकॉर्ड ठेवणे मेडिकलवाल्यांना बंधनकारक