घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशोध बेपत्ता मुलींचा : उमलत्या वयातच मुलामुलींचे पाऊल घसरण्याआधीच घडवा आयुष्य

शोध बेपत्ता मुलींचा : उमलत्या वयातच मुलामुलींचे पाऊल घसरण्याआधीच घडवा आयुष्य

Subscribe

नाशिक : बदलती जीवनशैली आणि इंटरनेटमुळे मुले-मुली लवकर वयात येत आहेत. किशोरवयात एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे हा हार्मोन्सचा प्रभाव असतो. त्यातून मुलामुलींना परस्पर आकर्षण वाटत असले तरीही या वयातील एक चूक आयुष्य उद्ध्वस्त करते. त्यामुळे किशोरवयातील मुलामुलींनी आधी अभ्यास व खेळावर लक्ष केंद्रित करावे. पालकांनीही मुलामुलींशी मनमोकळेपणे संवाद साधत किशोरवयातील प्रेमाचे धोके व अडचणी समजून सांगाव्यात, असा मोलाचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ उमेश नागापूरकर यांनी दै. ‘माय महानगर’शी बोलताना दिला.

नागापूरकर पुढे म्हणाले की, किशोरवयात मुलामुलींनी अभ्यास आणि खेळावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मात्र, त्या वयात अनेक मुलेमुली प्रेमात पडत असल्याचे दिसून आले आहे. अनेक मुलींची प्रेमसंबंध व लग्नानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टीव्ही, सिनेमांमुळे मुलामुलींना किशोरवयातच अनावश्यक गोष्टी समजू लागल्या आहेत. प्रेम समजण्याआधीच मित्रमैत्रिणींमुळे अनेक मुलामुलींना गर्लफ्रेंड व बॉयफ्रेंड हवेसे वाटतात. मुलेमुली किशोरवयात शिक्षण सोडून प्रेमप्रकरण करत असतील तर पालकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यांचे प्रेमसंबंध माहिती झाल्यास अनेक पालक निराश होतात. पालक मुलामुलींना मारहाण करत त्यांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणतात. त्यातून मुलेमुली कोमजून जातात. ते सुधारण्याऐवजी मनात राग ठेवून पालकांशी अल्प संवाद करू लागतात. त्यातून मुलामुलींच्या भावी आयुष्यावर विपरित परिणाम होतो.

- Advertisement -

तंत्रज्ञान, इंटरनेट आणि पालकांच्या दुर्लक्षामुळे अनेक मुलेमुली प्रेमप्रकरणाकडे आकर्षित होतात. शिवाय, हार्मोन्समध्ये लवकर वाढ झाल्याने मुलामुलींना आकर्षण आवडू लागते. पण ते चूक की बरोबर समजत नसते. अशावेळी पालकांनी मुलामुलींना आरडाओरड व मारहाण न करता त्यांच्याशी मनमोकपणे व विश्वासात घेऊन संवाद साधावा. प्रेमप्रकरणाचे फायदे व तोटे समजून सांगावेत.

अशी घ्या काळजी 

किशोरवयात मुलामुलींना आईवडिलांची गरज असते. त्यांना मित्रमैत्रिणी हव्याशा वाटू लागतात. त्यातून प्रेमप्रकरणही होण्याची शक्यता असते. मात्र, ते चूक की बरोबर समजत नसते. त्यावेळी पालकांनी मुलामुलींशी सकारात्मक संवाद साधावा. मुलमुलींच्या प्रेमसंबंधांविषयी समजल्यास पालकांनी शिक्षण, करिअर, व्यवसाय व नोकरीचे महत्व समजून सांगावे. योग्य वयात योग्य गोष्टी केल्यास काय फायदे होतात, ते पालकांनी सांगावे. अनेक मुलेमुली पालकांचे दुर्लक्ष, इंटरनेटमुळे प्रेमप्रकरणात अडकतात. त्या वयात त्यांचे शिक्षण पूर्ण नसते, नोकरी व व्यवसाय नसतो. ते आर्थिकदृष्टया कमकुवत असतात. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण होवून ते टोकाला जातात. तोपर्यंत वेळ गेलेली असते. अशावेळी पालकांनी वेळीच मुलांना धोके सांगावेत. किशोरवयात मुलींना अनेकजण प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी किंवा मानवी तस्करीसाठी प्रलोभने दाखवतात. अशा पालकांनी मुलींना मनमोकळेपणे फसवणुकीच्या फंड्यांची व मानवी तस्करीसह गूड टच व बॅड टचची माहिती द्यावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -