मुंबई – निर्भया आणि हाथरस बलात्कार प्रकरणात पीडितेच्या बाजूने खिंड लढवून न्याय मिळवून देणारी वकील आता श्रद्धा हत्याप्रकरणाची बाजू लढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील सीमा कुशवाह यांच्यांकडे श्रद्धा हत्याप्रकरण सोपवण्यात आले आहे. श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
वसई पोलिसांनी सहकार्य केले नाही, त्यामुळे श्रद्धाचा जीव गेला असा आरोप श्रद्धाच्या वडिलांनी आज केला. तसंच, या प्रकरणात किरीट सोमय्यांनी खूप मदत केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणावर वकील सीमा कुशवाह न्यायालयीन बाजू लढणार असल्याचीही माहिती देण्यात आली.
श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. लिव्ह इनमध्ये तिच्यासोबत राहणारा तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने मे महिन्यात तिची हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने जवळच्या जंगलात फेकून दिले आहेत. हे प्रकरण नोव्हेंबर महिन्यात उजेडात आल्यानंतर देशभर एकच खळबळ माजली. याप्रकरणातील नियमित अपडेट्स रोज समोर येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत माध्यमांपासून लांब राहिलेल्या श्रद्धाच्या नातेवाईकांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – श्रद्धा वालकरच्या वडिलांचे वसई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले असहकार्यामुळे…
याप्रकरणावर बोलताना सीमा कुशवाह म्हणाल्या की, डेटिंग अॅप वापरण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण अशा अॅप्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. गुन्हेगारी आणि दहशतवादी वृत्तीची माणसं येथे असू शकतात. तसंच, आफताबच्या कुटुंबीयांचीही नावे चार्जशीटमध्ये असली पाहिजेत, असं सीमा कुशावह म्हणाल्या.
Shraddha murder case | Though people have the right to use dating apps, these dating apps should be monitored. There can be criminals & terrorists…I think names of Aaftab’s family members should be there in chargesheet: Seema Kushwaha, Shraddha’s father’s lawyer pic.twitter.com/v7xQSNu3H5
— ANI (@ANI) December 9, 2022
कोण आहेत सीमा कुशवाह?
सीमा कुशावह यांनी निर्भया हत्याप्रकरण आणि हाथरस बलात्कार प्रकरणात सीमा कुशावह यांनी बाजू लढली होती. बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सीमा कुशवाह यांनी चळवळ उभारली आहे. त्या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. २०१२ मध्ये २३ वर्षीय तरुणीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्घृण हत्या झाली होती. या हत्येचे पडसाद संपूर्ण देशभर पडले होते. निर्भयाला न्याय मिळावा याकरता संपूर्ण देशाने प्रार्थना केली होती. त्यावेळी सीमा कुशावह यांनी निर्भयाची बाजू लावून धरली आणि तिला न्याय मिळवून दिला.
त्यानंतर, सप्टेंबर २०२० मध्ये १९ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी सीमा कुशावह यांनी पीडितेच्या बाजूने युक्तीवाद करून पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला होता. आता श्रद्धा हत्याप्रकरणातही सीमा कुशवाह बाजू लढवणार आहेत.