राज ठाकरे हे औरंगाबाद येथील महाराष्ट्र दिनाच्या सभेसाठी पुण्याहून रवाना झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारला मशीदीवरील भोंगे काढण्याचा अल्टीमेटमला आता काही तास उरले असतानाच औरंगाबाद येथे मनसेची सभा पार पडणार आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. दोघांनीही जाहीर कार्यक्रमात राज्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा प्रकरणाच्या निमित्ताने राज ठाकरेंना टिकेचे लक्ष केले आहे.
राज्यात आणि देशात सद्यस्थितीला समाजाला जात धर्माच्या नावाने मागे नेण्याचा प्रयत्न हा काही घटकांपासून होत आहे. त्यामध्ये लोकांचे समाजाचे मूलभूत प्रश्न काय याचा विचार न करता भरकटवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. समाजातील महागाई, अन्नधान्याच्या, सन्मानाने जगण्याचा, बेरोजगारी, भूकबळी यासारख्या विषयांवर कोणीच बोलत नाही आणि लक्षही देत नाही. सध्या वेगळ्याच मागण्या केल्या आहेत. काही लोक वेगळ्या मागण्या करून मूळ प्रश्नापासून समाजाला भरकटवण्याचे काम करत आहेत. अशा भलत्याच मागण्यांना टेलिव्हिजनवरही प्रसिद्धी मिळताना दिसते आहे, अशा शब्दात त्यांनी धर्माच्या नावावरून सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले. भटक्या विमुक्त समाजाकडून कृतज्ञता गौरव सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार बोलत होते.
सध्या टेलिव्हिजनवर पाहिले तर सभा कुणाची, कोण कुठे हनुमान चालीसा पठण करणार यासारख्या गोष्टींचीच चर्चा आहे. याच मागण्या आणि चर्चांना टेलिव्हिजनवर महत्व दिले जात आहे. पण या मागण्या आणि चर्चांमधून लोकांचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. समाजाला वेगळ्याच ठिकाणी न्यायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा मागण्या आणि चर्चांमुळे लोकांचे गरीबीचे, भुकेचे, रोजगाराचे आणम महागाईचे प्रश्न सुटणारे नाहीत. तसेच अन्यायातूनही आपल्याला सुटका मिळणार नाही. शाहु, फुले आणि आंबेडकरांचा विचार हाच समाजाला दृष्टी आणि शक्ती देणारा असा आहे.
सोलापूरच्या माळशिरस येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंना नाशिकमध्ये सत्ता मिळाली होती. पण राज ठाकरेंना नाशिकची सत्ता टिकवता आली नाही, अशा शब्दात अजितदादांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.