पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगांत टाकतात. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. (Sharad Pawar angry with BJP over Arvind Kejriwal arrest)
हेही वाचा… Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेवर शरद पवारांचा संताप, म्हणाले – भाजपाच्या आता दोन जागाही…
आज (ता. 22 मार्च) बारामतीत शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भाजपावर निशाणा साधत शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत या देशात काही अपवाद वेगळले तर निवडणूक मोकळ्या वातावरणात झाल्या आहेत. निवडणूक किती फेअर होईल या याबद्दल शंका आहे. संस्थांचा वापर केला जातोय, काँगेसची खाती गोठवली, देशातील महत्त्वाच्या पक्षाला साधनसामग्री नाही. याआधी अस कधी झालं नाही. विरोधी पक्षाच्या लोकांवर ईडी किंवा इतर संस्थांचा वापर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांच्याबाबत काही तरी होईल, अशी शंका होती. त्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात आली.
मुख्यमंत्री यांना अटक करण्यापर्यंत हे सरकार पोहोचले आहे. केजरीवाल यांना अटक झाली याचा अर्थ केजरीवाल यांच्या 100 टक्के जागा निवडून येतील. जे आणिबाणीत झाले नाही ते आता होतं आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकाकडून सुरू आहे. 80 ते 90 टक्के लोकांची केजरीवाल यांना पसंती आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या काही प्रमुख नेत्यांवर ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पण भाजपाला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असे म्हणत शरद पवारांनी केजरीवालांच्या अटकेचा निषेध केला आहे.
शरद पवार निवडणूक लढवणार की नाही?
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज प्रसार माध्यमांनी त्यांना माढ्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याबाबतचा प्रश्न विचारला असता, त्यांनी ते यापुढे कधीच निवडणुका लढवणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार आता यापुढे कधीच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.