‘राज्यातल्या निवडणुका कधी होतील, हे मला सांगता येणार नाही. परंतु आगामी निवडणुका लांबणीवर पडू शकतात. महाविकास आघाडीमध्ये कसलाही वाद नसून तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागावाटपाबाबत निर्णय घेतील’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ‘आगामी निवडणुका लांबणीवर पडू शकतात’, असे विधान केले आहे. (Sharad Pawar Elections May Be Delayed Due To Karnataka Assembly Result)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सात तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. याविषयी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. “देशात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या १० लोकांची चौकशी झालेली आहे. परंतु निष्पन्न काही झालं नाही. अनिल देशमुख यांच्यावर अतिरंजीत आरोप झाले. मात्र त्यातून काहीही पुढे आलेलं नाही. चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चांगलं काम करणाऱ्यांना त्रास, असं सुरु झालं”, असे शरद पवार म्हणाले.
“परमबीर सिंह यांच्याविरोधामध्ये किती तक्रारी आहेत, याचीही माहिती सरकारने घेतली पाहिजे. मलिकांनी वानखेडे यांच्याबद्दल जे सांगितलं होतं, ते आता खरं ठरलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेकांच्या चौकश्या झाल्या. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या चौकश्या होत आहेत. यावरुन सरकारची भूमिका लक्षात येते”, असेही शरद पवार म्हणाले.
लहरी माणसानं निर्णय घ्यावा तसा निर्णय घेतला – शरद पवार
यावेळी शरद पवार यांनी दोन हजारांच्या बंद केलेल्या नोटेवरुन केंद्राला धारेवर धरले. एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावा तसा निर्णय घेतला गेला आहे, अशा खोचक शब्दात त्यांनी टीका केली आहे. ‘नोटबंदीबाबत माझ्याकडं काही तक्रार आलीच तर विरोध कमी होईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी जो ताजा निर्णय घेतलाय तो एखाद्या लहरी माणसानं निर्णय घ्यावेत असा घेतलेला दिसतोय. मागे अशाच प्रकारचा निर्णय घेतला तर त्यात खूप लोकांचं नुकसान झालं’, असे शरद पवार म्हणाले.