पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत आज (ता. 28 मे) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमातून लोकशाहीचे प्रमुख असलेले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना आमंत्रित न करण्यात आल्याने विरोधकांनी आजच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. पण आजच्या या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसद भवन निर्मितीचा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेण्यात आले नाही. देशात जे काही सुरू आहे, ते लोकशाही विरोधी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला संताप व्यक्त केला. (Sharad Pawar first reaction to Inauguration of the New Parliament)
हेही वाचा – शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत सावरकर जयंती साजरी
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड काम सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ते पाहता जे आता पार्लमेंटमध्ये चाललंय यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठी नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हा सोहळा मर्यादित घटकांसाठीच होता की काय अशी शंका…
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रण देण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थित होते. त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. संसदेचा कार्यक्रम म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष दिसले. आनंद आहे. पण राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. त्यांची उपस्थिती यत्किंचित दिसली नाही. त्यामुळे हा सोहळा मर्यादित घटकांसाठीच होता की काय अशी शंका आहे, अशी टीका शरद पवार यांच्याकडून यावेळी करण्यात आली.
जुन्या संसदेशी बांधिलकी…
जी जुनी संसद आहे. त्याबद्दल आमची आस्था आहे. आमची बांधिलकी आहे. या देशात दिल्लीत कोणीही आले तर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गट दाखवले जातात. संसदेचं एक्झिबिशन आहे. त्याला लोक भेटतात. त्यातून देशाचा इतिहास मांडला जातो. त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का अशी शंका आहे, असं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले.
इतकी मोठी गोष्ट करताना विचाराचत घेतले नाही…
ठिक आहे. निर्णय घेतला. राबवला. त्याची चर्चाही झाली नाही. असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की नाही हे संसदेत मांडलं नाही. प्लान केला त्याची चर्चा मर्यादित लोकांशी केली असावी. पण आम्हाला सांगितलं नाही. इतकी मोठी गोष्ट करताना त्यांनी सर्वांना विचारात घ्यायला हवं होतं, असंही ते म्हणाले.
माझ्याकडे निमंत्रण आले नाही
विरोधी पक्षातील सभासदांना निमंत्रण दिलं की नाही माहीत नाही. माझ्या हातात निमंत्रण आले नाही. पण माझ्या दिल्लीच्या घरी पाठवलं असेल तर माहीत नाही. पण माझ्या हातात आलं नाही, असेही यावेळी पवारांकडून स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्री शिंदेंना तशी भाषा शोभते
विरोधकांमध्ये आजच्या कार्यक्रमामुळे पोटदुखी सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विरोधकांना जनता जमालगोटा देईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभते. त्यांच्या बुद्धीला जे पटते, ते बोलतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
‘या’ राजकीय पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार
1) काँग्रेस,
2) तृणमूल काँग्रेस,
3) द्रविड मुन्नत्र कळघम (DMK),
4) आम आदमी पार्टी,
5) शिवसेना (उद्धव ठाकरे गट),
6) समाजवादी पार्टी,
7) राष्टीय जनता दल,
8) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI),
9) झारखंड मुक्ती मोर्चा (JMM),
10) केरल काँग्रेस (मणि),
11) VCK,
12) राष्ट्रीय लोक दल,
13) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP,
14) जनता दल (संयुक्त) JDU,
15) CPI (M),
16) IUML,
17) नेशनल कॉन्फ्रेंस,
18) RSP,
19) AIMIM आणि
20) MDMK