राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सह्यादी अतिथिगृह येथे साखर उद्योगातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली होती. साखर उद्योगातील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार यांनी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही महत्त्वपुर्ण अशा सकारात्मक सूचना केल्या आहेत. कोरोना काळात साखर कारखाने बंद असल्यामुळे साखर कारखान्यांचे मोठं नुकसान झाले आहे. इथेनॉलच्या उत्पादनावरही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला बाळासाहेब पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी साखर उद्योगातील विविध समस्या व त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी साखर उद्योगातील विविध समस्या व त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली असता याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्याची सूचना मी केली होती. pic.twitter.com/yIVfTSEkYi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 12, 2021
शरद पवार यांनी या बैठकीस उपस्थित राहून संबंधित समस्यांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी काही सूचना केल्या. इथेनॉल उत्पादन वाढीकरता समोचित शासकीय धोरण व अर्थसहाय्याची घोषणा, उद्योगांकरता सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी, साखर कारखान्यांच्या कर्जांचे पुनर्गठन आदि बाबींवर विस्तृतपणे चर्चा झाली असल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे. यासोबतच साखर कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात महाराष्ट्र राज्य साखर कामगारांचे प्रतिनिधी मंडळ व साखर संघाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. महागाई निर्देशांक आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती या दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य वेतनवाढ करण्याबाबत सर्व प्रतिनिधींनी सहमती दर्शवली आहे.