राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल २०-२५ मिनिटे चर्चा झाली. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा याचा कयास लावला जात होता. नेमकी कशासंदर्भात चर्चा झाली याची माहिती स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा विषय आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाई संदर्भात पंत्परधान मोदींसोबत चर्चा केली, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीनंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदींसोबत काय चर्चा केली यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर ते माहिती देताना म्हणाले की, “संजय राऊत राज्यसभेचे माझी सहकारी, सामनाचे संपादक त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. त्यांचं फ्लॅट आणि अर्धा एकर जमीन जप्त केली आहे. हा अन्याय आहे. राज्यसभा सदस्य आणि जेष्ठ पत्रकार असल्याने मी ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या कानावर टाकली,” असं शरद पवार यांनी सांगितलं.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर चर्चा
गेल्या अडीच वर्षांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे, त्यावरही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन विषय मोदींच्या कानावर घातले. या २ विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली आहे.