राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत. पाकिस्तानमध्ये ज्यांना सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे, त्यांनाच दोन्ही देशामध्ये तणाव हवा असतो, असे खासदार शरद पवार म्हणाले. पुण्यातील कोंढवा परिसरात ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
जगात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियासारखा शक्तीशाली देश युक्रेनसारख्या लहान देशावर आक्रमण करत आहे. श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरून लढत असून तेथील नेते भूमिगत झाले आहेत. पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात. तेथे एक तरुण पंतप्रधान झाला, त्याने देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सत्तेतून बाहेर काढले. आता पाकिस्तानमध्ये वेगळे चित्र दिसत आहे, असे खासदार शरद पवार म्हणाले.
आम्ही पाकिस्तानमध्ये गेलो होतो. तेथे आमचे यथोचित स्वागत झाले. आम्ही आपल्या क्रिकेट लंघासोबत कराचीत गोलो होतो. सामना झाल्यानंतर खेळाडूंनी आजूबाजूची ठिकाणे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आम्ही नाश्त्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथल्या मालकाने आम्ही त्यांचे पाहुणे असल्याचे सांगत आमच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
शरद पवारांनी देशातील धार्मिक द्वेषाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले कारण स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांमध्ये एकी होती. त्यामुळे आज जर कोणी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या लोकांना एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे.