भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र विकास आघाडीत ठिणगी पडल्याचे वृत्ताची गंभीर दखल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. त्यानुसार सोमवारी तातडीने राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक मुंबईत बोलविली असून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत नेमकं शरद पवार काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून जळगाव दौर्यावर होते. रविवारी ते मुंबईत परतले असून त्यांनी तातडीची बैठक बोलविल्याने अनेकांच्या भुवया उंचविल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भीमा कोरेगावच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत बेबनाव सुरु झाल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतरही एनआयएकडे तपास सुपूर्द करण्यात आल्याने ही ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही बैठक बोलविल्याचे बोलले जाते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे असे राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील वकील परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. मात्र जळगाव दौरा आटोपून नाशिकला आल्यानंतर ते थेट मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. राज्य सरकारकडून तपास काढून घेणं अयोग्य असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. जळगाव दौर्यावर असलेल्या पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.