महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक आणि राज्यातील कोरोनाची वाढती स्थिती याविषयांवर चर्चा झाल्याचे कळते. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सचिन वाझे यांचा मुद्दा लावून धरला होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्याचे प्रकरण चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेल्यानंतर वाझे यांना अटक करण्यात आली. या अटकेवरून आघाडीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. तर शिवसेनेने वाझेंना आवश्यक्यतेपेक्षा जास्त महत्व दिल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जाते.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांचे काम अतिशय योग्यरित्या करत आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत येणा-या बातम्या केवळ वावडया आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेबदल होण्याबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्याच्या प्रश्नांवर नेहमीच चर्चा होत असते. आज सकाळी झालेली बैठक हा याचाच भाग होता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता फेटाळली. अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहे. त्यामुळे खातेबदल होणार या वावड्या आहेत. अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी कोणी काही चुका केल्या असतील तर चौकशीअंती त्याच्यावर कारवाई होईलच.त्यात सरकार कोणाचीही बाजू घेणार नाही वा पाठिशीही घालणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.