राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. गडचिरोलीत नुकतीच पोलिसांनी कारवाई करत २६ नक्षलींचा खात्मा केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत सुधारणा झाली असून याकडे आता दुर्लक्ष करुन चालणार नाही असे म्हटलं आहे. तसेच आता राज्यातील बड्या शहरांमध्ये शहरी नक्षलवाद वाढत चालला आहे त्यावर वेळेत कारवाई केली पाहिजे अशी सूचना शरद पवार यांनी राज्य सरकारला दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी विदर्भ दौऱ्यादरम्यान गडचिरोलीत होते. शरद पवार यांनी गडचिरोलीतील आदिवासी तरुणांशी संवाद साधला आहे. तसेच काही दिवसांपुर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईची देखील माहिती घेतली आहे. नक्षलवाद्यांच्याविरोधातील कारवाईमध्ये पुर्वीपेक्षा अधिक सुधारणा झाली असून याकडे आता दुर्लक्ष करुन चालणार नाही. यासोबत राज्यातील शहरीभागात शहरी नक्षलवाद वाढला आहे. नागपूर ते पुण्यापर्यंत हा नक्षलवाद पसरला आहे त्यामुळे आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे अशी सूचना शरद पवार यांनी दिली आहे.
राज्यात मुंबई, पुणे आणि केरळातही शहरी नक्षलवाद वाढत चालला आहे. हा वर्ग महाविकास आघाडी सरकारविरोधात वेगळं वातावरण निर्मिती कऱण्याचा प्रयत्न करत आहे. समाजासह देशात असे काही लोकं आहेत जे राज्य सरकारविरोधात द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. याला आपण शहरी नक्षलवाद असे म्हणू शकतो. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असून राष्ट्रवादीकडेच गृहखाते आहे. त्यामुळे या काय कारवाई करण्यात येत आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असते असेही शरद पवार म्हणाले.
नव्या पिढीसाठी रोजगार निर्मितीची गरज
राज्यातील नव्या पिढीचं फ्रस्टेशन घालवायचे असल्यास त्यांच्यासाठी रोजगाराची निर्मिती करणे गरजेचे आहे. गडचिरोलीतील सुरजागड खाणीत १० हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे असे शरद पवार यांनी सांगितले.
हेही वाचा : Farm Laws : तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा