शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे हे दुपारी १ वाजताच्याय दरम्यान औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. परंतु उद्धव ठाकरे दौऱ्यावर पोहोचल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. दरम्यान, शेतकरी संकटात असताना जर कुणी आधार देत असेल, बांधावर जाऊन त्यांच्या अडअडचणी समजून घेत असेल तर शंका घ्यायचं काय कारण?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित करत विरोधकांना टोला लगावला.
शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंच्या दौऱ्याला उशीर झाला का?, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता शरद पवार म्हणाले की, गेले काही दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती. जशी त्यांची तब्येत सुधारतेय तसं ते बाहेर पडत आहेत. लोकांचं सुख दुख पाहायला कोणीही जात असेल तर त्यात शंका घेण्याचं काही कारण नाही. त्यांनी ते बघावं, त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला काही सूचना कराव्यात, त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला तर माझ्यामते ही चांगली गोष्ट आहे, असं शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन
जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे. दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली. अर्थव्यवस्था ठप्प असताना तुम्ही राज्याचं अर्थचक्र चालवलं. शेतीने आपल्या अर्थव्यवस्थेला सावरलं. त्यामुळे तुम्ही आता धीर सोडू नका, खचून जाऊ नका. आपण मदत द्यायला सरकारला भाग पाडू, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलं.
हेही वाचा : सरकार उत्सवमग्न, त्यांच्याकडे भावनांचा दुष्काळ; उद्धव ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद