मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, असे वक्तव्य गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. पण लेकीने केलेल्या वक्तव्याला काल (ता. 25 ऑगस्ट) शरद पवार यांच्याकडून सुद्धा दुजोरा देण्यात आला होता. अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचे कारण नाही, असे वक्तव्य बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केले. पण काही अवघ्या पाच तासांमध्ये शरद पवार यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव करत सर्वांनाच संभ्रमात पाडले. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील त्यांच्या वक्तव्यावर टीका केली. पण त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी कोण बच्चू कडू बाबा? असे म्हणत टोला लगावला आहे. (Sharad Pawar’s sharp response to Bachu Kadu’s criticism)
हेही वाचा – NCP Split : हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाडांमधील वाद उफाळला, वाचा काय आहे प्रकरण?
शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसे त्यांनी कधीच केलेले दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे किंवा कार्यकर्त्यांचे डोके फुटू नये एवढंच मी सांगेन. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. ज्यानंतर बच्चू कडू यांच्या या टीकेला शरद पवार काही उत्तर देतात की नाही? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. पण आज (ता. 26 ऑगस्ट) कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.
बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेबाबत आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे तुम्ही उद्या तर आणखीन कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मला मागाल, असा टोला पवारांनी लगावला आहे.
शरद पवार यांची वाटचाल ही एनडीएच्या दिशेने आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. याबाबत देखील पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता पवार म्हणाले की, एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाने असे विधान करणे हे मुर्खाचे नंदनवन आहे. त्यांना साधे बोलण्याचे तार्तम्य माहीत नाही. त्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे पक्षाच्या नेतृत्वाची पातळी किती खाली घसरली आहे, हे दाखवून देतात, असे शरद पवारांकडून सांगण्यात आले.