राज्यातील राजकीय घडामोडी पाहिली असता राजकीय संघर्ष आता कायदेशीर मार्गाने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंकडे जवळपास ४०हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे शिंदेच्या गटातील संख्याबळ जास्त असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे १२ आमदारांना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षादेश न मानल्याने एका खासदाराला दणका बसला होता. त्यामुळे आता शिंदे गटाला फटका बसणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
२०१७ मध्ये राज्यसभेतून शरद यादव यांनी पक्षादेश न मानल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. जनता दल युनायटेडने पक्षाच्या निर्देशाचे उल्लंघन करून पाटणा येथे विरोधी पक्षांच्या रॅलीत हजेरी लावण्याच्या कारणावरून त्यांची राज्यसभेतून अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यामुळे बंडखोर खासदार शरद यादव आणि अली अन्वर यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्यात आले.
दोन वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे आणि विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांचे सदस्यत्व स्वच्छेने सोडले होते. त्यामुळे जेडेयूच्या युक्तिवादाला राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सहमती देत राज्यसभेतून अपात्र ठरवले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ३७ शिवसेनेच्या आमदारांचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना काल रात्री पाठवले आहे. परंतु शिवसेनेकडून १२ आमदारांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेने त्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे राजकीय पातळीवर विधानसभा उपाध्यक्ष काय निर्णय घेतात आणि शिंदे गटाला धक्का देणार का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा : अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, चंद्रकांत पाटलांची स्पष्टोक्ती