घरमहाराष्ट्रसामुदायिक शक्तींसमोर शक्तीशाली प्रवृत्तीही टिकत नाहीत

सामुदायिक शक्तींसमोर शक्तीशाली प्रवृत्तीही टिकत नाहीत

Subscribe

भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किंचितही आस्था नसलेला पक्ष आहे. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान सोडले.

पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी परभणी, वर्धा, नांदेड, पुणे येथील अनेक भाजप, वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. गेल्या आठवड्यातील उत्तर प्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते सांगत होते की उत्तर प्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज एक दिवस असा जात नाही की, भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडणार्‍यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे, असे पवार म्हणाले.

- Advertisement -

१४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला, तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता. त्याच्या पूर्वसंध्येला आज प्रदेश कार्यालयात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. आज फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आधारित समाजकारण करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, परभणीतील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धा जिल्ह्यातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुण्यातील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रद्धा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, पैठणमधील किशोर दसपुते आदींनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच अन्य नेते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -