शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून स्वत: ला प्रमोट करण्याचं काम सुरू आहे. व्यासपीठावरील नेत्यांचा प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. सर्वसामान्य जनतेच्या पैशावर हा कार्यक्रम सुरू करण्याचा नवीन जुमला या सरकारने सुरू केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. ( Shasan Aaplya Dari program to promote Ourselves NCP leader Supriya Sule targets DCM Devendra Fadnavis )
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम त्या व्यासपीठावरील नेत्यांना प्रमोट करण्यासाठी केला जात आहे. गरीब मायबाप जनतेच्या पैशावर नवीन जुमला या सरकारने बांधला आहे. करदात्यांचे पैसे जाहीरातींवर खर्च केले जातात, कार्यक्रमासाठी करोडो रुपयांचा चुराडा करण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या आधारे शासन तुमच्या दारी द्या, ग्रामपंचायतीला द्या असं सुळे यावेळी म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंत पाटील मंत्री असताना त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला वायफाय देऊन त्यांच्या दारापर्यंत, घरापर्यंत पोहचण्याचं काम केलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर न करुन स्वत:चं प्रमोशन करण्यासाठी हा कार्यक्रम घेत केविलवाणा प्रयोग केला जात आहे. त्याचसोबत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम स्वत:चा प्रचार करण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवला जात असल्याची टीका करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे ST बस रद्द
शिर्डी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्यामुळे दररोजच्या मार्गावरील एसटी बससेवा बंद करून नागरिकांना कार्यक्रमाला नेण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसहित सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला असून शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना आपल्या गाडीतून शाळेत सोडलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
( हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळेंचा राज ठाकरेंना सल्ला, तर शरद पवारांवर केली टीका, म्हणाले… )