Kapil Sibbal Tactic | नवी दिल्ली – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अल्टिमेटम देण्याकरता उद्धव ठाकरेंनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र, या बैठकीला एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गैरहजर राहिले होते. याच बैठकीचा मुद्दा आजच्या निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. त्या बैठकीत गैरहजर राहिल्याने शिंदे गट राजकीय पक्ष नाही, असं कपिल सिब्बल म्हणाले.
हेही वाचा – शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना अल्टिमेटम, आजच्या बैठकीत हजरा राहा, अन्यथा…
२२ जून २०२२ रोजी शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय यांच्याकडून एक प्रसिद्धी पत्रक प्रत्येक आमदाराला पाठवण्यात आले होते. त्यानुसार, सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला हजर न राहिल्यास शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा पक्का आहे, असं समजलं जाईल, असं या पत्रकात म्हटलं होतं. मात्र, या बैठकीला शिंदे गटातील एकही आमदार उपस्थित राहिला नाही. त्यावेळी हे सर्व आमदार सूरतला होते.
आज युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा उचलून धरला. पक्षाच्या बैठका बोलावल्या होत्या तेव्हा शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला निघून गेले. पक्षाने बोलावलेल्या बैठकीत या आमदारांनी येणं अपेक्षित होतं. लोकशाही पद्धतीने त्यांना आपलं मत मांडता आलं असतं. त्यांनी म्हणणं न मांडता पक्ष सोडला”, असं कपिल सिब्बल म्हणाले. तसंच, “शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही. शिंदे गटाच्या नेत्यांनी लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं. ते गुवाहाटीला का गेले? पक्षाने बोलावलेल्या सभेत शिंदे गट उपस्थित नव्हते. शिंदे गट राजकीय पक्ष नाही”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा – शिवसेना पक्षचिन्हासह पक्षप्रमुखपदही अधांतरी, निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारीला सुनावणी
दरम्यान, दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आता पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी ठेवली आहे. ३० जानेवारीला दोन्ही गटांना लेखी उत्तर देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २३ जानेवारीला शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे आजच्या जोरदार युक्तीवादानंतरही निकाल न लागल्याने पक्षप्रमुख पद आणि पक्षचिन्हाचा पेच कायम राहिला आहे. आता यावर सोमवार, ३० जानेवारी रोजी सुनावणी होईल. या सुनावणीत कोणाच्या बाजूने निकाल लागतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
त्या बैठकीला हजर राहून उदय सामंत शिंदे गटात गेले
२२ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती. तेव्हा उदय सामंत ठाकरे गटातच होते. मातोश्रीत ५ वाजता बैठक होणार होती. मात्र, उदय सामंत बैठक संपण्याच्या काही वेळाआधी मातोश्रीवर गेले. बैठक अंतिम टप्प्यात असताना उदय सामंतांनी हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र, लागलीच दुसऱ्या दिवशी उदय सामंत शिंदे गटात सामील झाले.
हेही वाचा – उदय सामंत शिंदे गटात सामील, उद्या मांडणार भूमिका