मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर खातेवाटपही झाली. मात्र या खाते वाटपावरून शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे चर्चा सुरु आहे. यात भाजपने अनेक मलाईदार खाती आपल्या ठेवल्याने हे मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेय. यावरून आज सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले शंभूराजे देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खातेवाटपावर शिंदे गटातील आमदार नाराज नाहीत असे स्पष्टीकरण शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहे. शंभूराजे देसाई आज सकाळी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, कोणत्या मंत्र्याला कोणते विभाग द्यायचे याचे पूर्णपणाने अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहेत, पहिल्याच दिवशी आम्ही आमचे अधिकारी, आम्हाला मंत्रिमंडळात घ्याचं की नाही घेतल्यानंतर कोणतं खातं द्यायचं त्यावर आम्ही शिवसेनेचे 40 आमदार आणि 11 अपक्ष आमदारांनी एकमताने सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहे. त्यामुळे आमचे कोणीही मंत्री असं बोलत नाहीत की नाराज आहे. ते स्वत: बोलत नसताना कोणीतरी अश्यापद्धतीने वावड्या उठवत आहे.
देसाई पुढे म्हणाले की, त्याबाबत अनेक मंत्र्यांनी सांगितले आहे की, जो प्रभाग, विभाग आमच्याकडे दिला त्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असल्याप्रमाणे करण्यावर आमचा भर राहिल. त्यामुळे आम्ही कुणी त्याबाबत नाराज नाही. खाते बदल करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकाराबाबत आम्ही मंत्र्यांनी बोलणं योग्य नाही. सत्ता डोक्यात जाण्यांपैकी आम्ही 51 पैकी कोणी आमदार नाही, असही ते म्हणाले.
प्रकाश सुर्वेंच्या आक्रमक भाषणावर बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले की, प्रकाश सुर्वेंची ती व्हिडीओ क्लिप मी टीव्हीवर पाहिली, एखाद्या वेळी अॅक्शनला रिअॅक्शनचा तो प्रकार असू शकतो. कारण ते स्वत:हून अशापद्धतीने आक्रमकपणाने बोलतील असं मला वाटत नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांवर सहकार्यांवर त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर या वक्तव्यापूर्वी दमदाटी, दादागिरी केली असेल, मारहाण केली असेल तर अशा कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी त्यांनी आदर देण्यासाठी असे विधान केले असल्याचे मला वाटते. मात्र याबाबत अधिकृत माहिती घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु.