पुणे : काल रविवारी (ता. 31 मार्च) एका शिवसैनिकाने शिवसेना नेते विजय शिवतारे यांना खरमरीत पत्र लिहित कानउघडणी केली. घोडा-मैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली, अशी खंत त्या अज्ञात कार्यकर्त्याने बोलून दाखवली. या कार्यकर्त्याच्या पत्राला आता शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने प्रत्युत्तर दिले आहे. “तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पत्रातल्या पहिल्या वाक्यातूनच पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांनी ओळखलं होतं.” असे म्हणत त्या अज्ञात शिवसैनिकावर खडेबोल सुनावले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या एखतपूर येथील माणिक निंबाळकर नामक विजय शिवतारेंतच्या कार्यकर्त्याने हे पत्र लिहिले आहे. (Shiv Sainik’s reply to the letter written to Vijay Shivtare)
शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या माणिक निंबाळकर यांने पत्रात लिहिले आहे की, निनावी पत्र लिहिण्यापेक्षा तो बिनधास्त स्वतःच्या नावाने पत्र लिहितो. त्यामुळे हा उपद्व्याप केवळ महायुतीला विरोधासाठीच केलेला असल्याने आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही. तसंही तू आधी सामान्य बारामतीकर म्हणून केलेला असाच निनावी पत्रव्यवहार आम्ही अजून विसरलो नाही, असे विजय शिवतारेंवर टीका करणाऱ्या अज्ञात शिवसैनिकाला सुनावले आहे.
तसेच, बापूंनी (विजय शिवतारे) अजित पवारांशी तह केल्याचे दुःख शिवसैनिकांना अजिबात नाही. पण त्यामुळे महाविकास आघाडीच्या तंबूत किती घबराट निर्माण झाली आहे ते अशा बोगस पत्रामुळेच आम्हाला समजले. ह्याच पुरंदरला महाराजांनी तह करून 23 किल्ले गनिमाला देऊ केले होते. पण त्यानंतर अवघ्या काही कालावधीत आपल्या मुळ किल्ल्यांसह मराठी साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून दिले होते. हल्ला, प्रतिहल्ला, त्याग, समर्पण, तह आणि त्यातून जनकल्याण साधणे हे पुरंदरला नवीन नाही. ज्या माणसाने पुरंदरच्या पाण्यासाठी स्वतःचे अपरिमित शारीरिक नुकसान करून घेतले त्याला गुंजवणीच्या पाण्यापेक्षा मोठे काहीच नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न या तहातून सुटणार असतील तर असा तह करणे कधीही योग्यच. बारामतीत बसून अशी पत्र लिहिण्यापेक्षा बारामतीच्या सुपे परगण्यात, पुरंदरच्या पूर्व भागात आणि इतर दुष्काळी परिसरात फिरलास तर गुंजवणीचे महत्त्व तुला कळेल. राहिला प्रश्न विश्वासार्हतेचा. महाविकास आघाडी हाच मुळात पलटूराम लोकांचा मेळावा आहे. ज्यांची आयुष्ये स्वार्थासाठी पलट्या आणि कोलांटउड्या मारण्यात गेली त्यांनी विजय शिवतारे यांना विश्वासार्हता शिकवावी हाच मोठा विनोद आहे. खोके वगैरेची आवश्यकता शिवतारे यांना मुळीच नाही. त्यांच्या पुढच्या पिढीलाही नाही. इथला प्रत्येक नागरीक हे जाणतो, असे माणिक निंबाळकर यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.
तर, “बाकी शिवतारे यांचा आवाका ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी व्यवस्थित कळला आहे. तू खरंच शिवसैनिक असशील तर यापुढे उघडपणे स्वतःच्या नाव पत्त्यासह पत्र पाठव. शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे. धन्यवाद. पुन्हा एकदा सप्रेम जय महाराष्ट्र! तुझा, (माणिक निंबाळकर) मु. एखतपुर ता. पुरंदर जि. पुणे” असा टोलाही या पत्राच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे. पण विजय शिवतारांने नेमके कोणत्या शिवैसनिकाने पत्र लिहिले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.