घरताज्या घडामोडी३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली; आदित्य ठाकरे माहिममध्ये बंडखोरांवर...

३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली; आदित्य ठाकरे माहिममध्ये बंडखोरांवर बरसले

Subscribe

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी माहीम कोळीवाडा येथील शाखा क्रमांक १८२ ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले. ३३ देशांनी यांच्या बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर तोफ डागली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी माहीम कोळीवाडा येथील शाखा क्रमांक १८२ ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले. ३३ देशांनी यांच्या बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर तोफ डागली. दरम्यान, शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन केलं. (Shiv sena leader aaditya thackeray slams cm eknath shinde group)

आदित्य ठाकरे यांचं शाखेत आगमन झालं तेव्हा फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी फटक्यांवरून गद्दारांवर उपहासात्मक टोला लगावला. 50 चा बार आहे तो आधीच फुटला आहे. जे फुटायचे होते ते फुटले, आता कोणी नाही फुटणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, माहीमने वाढवलं, मोठं केलं ते फुटले. त्याबद्दल वाईट वाटतंय. ज्यांना जायचं होतं ते गेले, आता नवीन लोकांना संधी देणार. गरजेपेक्षा जास्त दिलं त्याचं अपचन झालं म्हणून हाजमोला खाण्यासाठी ते तिकडे गेले. महाराष्ट्रात चांगलं सुरू होतं, हे बघवलं नाही म्हणून फुटले. उद्धव साहेबांसारख्या चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोरोना काळात चांगलं काम केलं. जातीय वाद झाले नाहीत, महाराष्ट्र पुढे जात होता. तेव्हा विरोधकांना महाराष्ट्र पुढे जात आहे त्याला अडवायला सुरुवात केली, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्यपाल यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य केलं होतं. नुकतंच त्यांनी मुंबई ठाणे बद्दल वक्तव्य केलं. मी बरेच राज्यपाल पाहिले पण असे राज्यपाल पाहिले नाही. पी अलेक्झांडर पासून आतपर्यंत राज्यपाल झाले; पण असे राज्यपाल बघितले नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकार असताना आम्ही हजारो कोटींचे उद्योग महाराष्ट्रात आणले. उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळात चांगलं काम केलं. माहीमबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलायला आहे. अनेक कामांच्या इथे माझ्या नावाचं फलक लावलं नाही. आज आपलं सरकार असतं तर माहीम किल्ला पर्यटनासाठी खुला करून रोजगार उपलब्ध केला असता. अनेक गोष्टी आपण दादर माहीम येथे केल्या आहेत. महाराष्ट्र, मुंबई पुढे जात होती. महाराष्ट्र, मुंबईचा विकास अडवायचा विचार या बंडखोरांच्या मनात आला असावा. मुंबईचा विकास होतोय हे त्यांच्या पोटात दुखत होतं. उद्या BEST ला 75 वर्ष होताहेत. आपण बेस्टचं तिकीट कमी केलं. 5 किलोमीटर 5 रुपयात प्रवास असं आपण केलं होतं. महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या गद्दारांनी रोखलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, गद्दारी केल्यानंतर काय काय कारणं दिली; एक कारण दिलं वार्ड ऑफिस सहकार्य करत नाही. स्थायी समिती अध्यक्ष राहिलेलं माणसाला वार्ड ऑफिसर ऐकत नाही. एकजण तर कोण आदित्य, ओळखत नाही, एक आमदार आहे तो, असं वक्तव्य केलं. हो मी साधा आमदार आहे, मी एक सच्चा शिवसैनिक आहे, असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

काहीजण सांगतात उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. आदित्य आम्हाला मुलासारखा आहे. पण दुसरा येतो आणि टीका करून जातो. या गद्दारांबद्दल माझ्या मनात राग नाही; पण मनात वाईट वाटतंय, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली.

काय म्हणतात गद्दारी केली, क्रांती केली, 33 देशांनी क्रांतीची नोंद घेतली म्हणतात. 33 देशांनी गद्दारीची नोंद घेतली, बंडखोरी नाही. बंड करायचं होतं, क्रांती करायची होती तर महाराष्ट्रात राहून करायची होती. गुवाहाटी गेले, झाडी, डोंगर बघत होते. तिथे आसाम ला पूर आला होता पण हे ट्रॅक पॅन्ट टीशर्ट घालून मजा करत होते. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असते तर त्यांनी पाण्यात उतरून तिथे मदत केली असती. त्यानंतर गोव्यात आले. उध्दवसाहेब यांनी राजीनामा दिला तेव्हा हे गोव्यात टेबलावर नाचत होते, बारमध्ये नाचतात तसं; त्यानंतर त्यांना गोव्यातून फरफटून महाराष्ट्रात आणलं. हे जरी बंडखोरी म्हणत असले तरी हे गद्दार म्हणजे गद्दार राहणारच, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यातील बेकायदेशीर सरकार आहे. जम्बो मंत्रिमंडळ आहे. पण काही निर्णय घ्यायचा असेल दिल्लीवारी करतात. हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. नेमका मुख्यमंत्री कोण आहे? माईक काय काढून घेतात, चिठ्ठी काय देतातहे आधी कधी झालं नव्हतं. हे सरकारच बेकायदेशीर आहे आणि हे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, दिल्लीत जाताना विमान हवेत 5-10 मिनिटं विमान थांबवलं म्हणे, एकदा महाराष्ट्रावर पण विमान थांबवा आणि काय चालू आहे ते बघा, असा सल्ला दिला. उद्धव ठाकरे आजारी असताना हे निर्लज्ज गद्दार लोक मुख्यमंत्री कसं बनता येईल, फुटायचा विचार करत होते. हे राज्यकर्ते चालतील तुम्हाला असा सवाल करत तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार आहात की नाही, आदित्य ठाकरे यांचा जमलेल्या शिवसैनिकांना सवाल केला. त्यावेळी शिवसैनिकांनी हात वरून करून दिला पाठिंबा दिला.


हेही वाचा – तब्बल 9 तासांनंतर संपली वर्षा राऊत यांची ईडी चौकशी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -