रायगड लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा अवघ्या १९४४ मतांनी पराभव झाला होता. सुनील तटकरेंचा हा पराभव खुद्द सुनील तटकरेंनीच केला होता. हो हे खरंय. कारण अपक्ष उभे राहिलेले सुनील तटकरे यांनी तब्बल ९ हजार ८४७ मते मिळवली होती. यावेळी देखील रायगड मतदारसंघात २०१४ ची पुर्नवृत्ती होईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण यावेळी विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या नावाचा आणखी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
२०१४ साली मोदी लाट असूनही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी ३ लाख ९४ हजार ७ मते मिळवली होती. त्यावेळचे विद्यमान खासदार अनंत गीतेंना तटकरे यांनी कडवी झुंज दिली होती. मात्र सुनील तटकरे नामक अपक्ष उमेदवाराने ९ हजार ८४९ मते घेतल्यामुळे तटकरेंचा लोकसभेत जाण्याचा मार्ग रोखला होता. याचा फायदा अनंत गीतेंना झाला. युती सरकार असल्यामुळे गींतेंना केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपदही मिळाले. २०१४ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता तटकरेंनी कंबर कसली आहे.
मागच्या वेळी शेकापचे उमेदवार रमेश कदम यांनी १ लाख ९७ हजार ९ मते मिळवली होती. त्या मतविभाजनाचा फायदा शिवसेनेच्या गीतेंना मिळाला. यावेळी शेकाप राष्ट्रवादीसोबत असल्यामुळे शेकापची लाखभर मते तटकरेंकडे वळणार, हे निश्चित. राष्ट्रवादी-शेकापच्या आघाडीमुळे गीतेंचे टेंशन मात्र चांगलेच वाढले आहे. कारण यावेळी अपक्ष अनंत गीते निवडणूक लढवत आहे.
केंद्रीय मंत्री अनंत गीतेंच्या समोर अनंत अडचणी
रायगड मधून ‘अनंत पद्मा गीते’ नामक उमेदवाराने आपला अर्ज भरलेला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांना शिवसेनेतूनच अंतर्गत विरोध असल्याचे कळते. तसेच ३० वर्ष खासदारकी असूनही मतदारसंघात फारशी कामे झालेली नाहीत. अवजड उद्योग मंत्री असून देखील ते मतदारसंघात कारखाना किंवा रोजगार आणू शकले नाहीत, अशीही अनेकांची तक्रार आहे. त्यातच आता डुप्लिकेट अनंत गीते निवडणुकीला उभे राहिल्यामुळे लोकसभा २०१९ चा गड सर करणे विद्यमान खासदारांसाठी सोपे नाही.