शिवसेना खासदार संजय राऊत जर ईडी कोठडीत असतील तर सामनामध्ये त्यांचा लेख कसा काय छापून येऊ शकतो?, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता. तसेच, मागील रविवारी प्रसिद्ध झालेल्या ‘रोखठोक’बाबत त्यांनी आक्षेपही नोंदवला होता. त्यानंतर आज (रविवारी) पुन्हा एकदा संजय राऊत यांची ओळख असलेले साप्ताहिक कॉलम ‘रोखठोक’ प्रसिद्ध झाले. परंतु, यावेळेस संजय राऊत यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे रोखठोक कोण लिहितंय असा सवाल उपस्थित होत आहे. (shiv sena sanjay raut rokhthok saamana mumbai )
मागील रविवारी प्रसिद्ध झालेल्या ‘रोखठोक’वर मनसेने टीकास्त्र सोडले होते. सामनामध्ये संजय राऊतांचे रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की, त्यांना जेलमधून लेखनाची परवानगी मिळावी? का त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?, असे सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले होते. त्यावर शिवसेनेकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. अद्याप शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. शिवाय राऊत आता न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना वाचण्याची व लिहिण्याची परवानगी आहे.
मागील रविवारी ‘रोखठोक’ प्रसिद्ध झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत प्रश्न पडला होता. त्यावेळी ईडीकडून राऊतांची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, संजय राऊत हे कोठडीत असताना लेख किंवा कॉलम लिहू शकत नाहीत. न्यायालय त्यांना जोपर्यंत विशेष परवानगी देत नाही, तोपर्यंत ते काहीही करू शकत नाहीत. कोर्टाने त्यांना अशी कुठलीही परवानगी दिलेली नाहीये की, त्यामुळे त्यांनी तुरूंगात लेख लिहावा. मात्र, त्यांनी हा लेख लिहिला असेल तर तो बाहेर कसा गेला? याचा तपास ईडी करणार असल्याचेही सांगण्यात आले होते.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार, 22 ऑगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आजपासून संजय राऊतांचा मुक्काम अर्थर रोड तुरुंगात आहे.
दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळ्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. 31 जुलै रोजी ईडीने संजय राऊतांच्या घरी ईडीने छापेमारी केली. यामध्ये काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागली. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेत, दक्षिण मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. त्यानंतर काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच करणार जनतेला संबोधित