मुंबई : भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिंगोलीतील लोकसभा उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. शिवसेना शिंदे गटाने येथून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिले आहे. तर 2004 पासून सलग चारवेळा लोकसभेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना भाजपच्या प्रखर विरोधामुळे उमेदवारी गमवावी लागली आहे. शिंदे गटाने येथून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या दबावाला बळी पडून उमेदवार बदलणे तसेच तिकीट नाकारण्याचा प्रकार होत असल्याने शिंदे गटात प्रचंड असंतोष आहे. (Shiv Sena Shinde reluctant to change candidate to Hingoli Bhavna Gavi candidature was also rejected)
महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असताना शिंदे गटाने 27 मार्चला आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. या विरोधानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीतील भाजप नेत्यांनी हेमंत पाटील यांच्याऐवजी अन्य उमेदवार द्या, अशी सूचना शिंदे यांनी केली. भाजपच्या या आग्रहामुळे शिंदे यांनी हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. पाटील यांच्या जागी आता बाबूराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : मातोश्रीवर मिळणारा सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही; अंबादास दानवेंचे खोचक ट्वीट
शिवसेना शिंदे गटाने हिंगोलीचा उमेदवार बदलताना यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांना यावेळी संधी न देण्याचा निर्णय घेतला आहे. भावना गवळी या २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग चारवेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. यावेळीही त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. मात्र, भाजपकडून भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध होता. गवळी यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरु असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नये, असे भाजपने शिंदे यांना स्पष्टपणे सांगितले होते. भाजपच्या या विरोधामुळे यंदा भावना गवळी यांना लोकसभेची उमेदवारी मिळवता आली नाही. हिंगोली आणि यवतमाळ – वाशीममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, गुरुवारचा शेवटचा दिवस आहे.
आतापर्यंत तीन खासदारांचा पत्ता कट
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधातील बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या मावळत्या लोकसभेच्या १३ खासदारांपैकी आतापर्यंत तीन जणांना उमेदवारी मिळालेली नाही. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या खासदारांमध्ये कृपाल तुमाने, हेमंत पाटील आणि भावना गवळी यांचा समावेश आहे. अशातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अधांतरी आहे. त्यामुळे शिंदे गटात भाजपच्या दाबवतंत्राविरोधात नाराजी आहे. लोकसभेचे उमेदवार निश्चित करताना भाजपचा दबाव सहन करावा लागत असेल तर विधानसभा निवडणुकीत काय होणार, याची चिंता शिंदे गटाच्या आमदारांना लागली आहे.
हेही वाचा – LOK SABHA 2024 : मविआतील जागावाटपाचा तिढा सुटेना, नाना पटोले म्हणतात – आग्रही राहू नये…