Committee For Anti-Party Activities | मुंबई – शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आज महत्त्वाच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यानुसार, पक्षाविरोधी कारवाई झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिवसेनेने शिस्तभंग समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी मंत्री दादा भुसे असणार आहेत, तर मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे या समितीचे सदस्य असणार आहेत.
हेही वाचा – ठरलं! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत अंतर्गत दुफळी माजली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. पक्षांतर्गातील हा वाद इतका विकोपाला गेला की यात निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर, साक्षी-पुराव्यांच्या आधारे निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला. या निकालानुसार, शिवसेना पक्षावर शिंदे गटाने विजय मिळवला. म्हणजे, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाच्या ताब्यात आले.
दरम्यान, शिंदे गटाच्या ताब्यात आलेल्या शिवसेनेत पुन्हा दुफळी माजू नये. कोणीही पक्षविरोधी कारवाया करू नये याकरता शिवसेनेने शिस्तभंग समितीची स्थापना केली आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना गेली असली तरीही विधिमंडळात ठाकरे गटातील आमदार हे शिवसेनेचे सदस्य आहेत. या ठाकरे गटातील आमदारांकडून पक्षाविरोधी कारवाया होऊ नये याकरता शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली असावी.
याबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले की, पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करणाऱ्यास किंवा पक्षाविरोधात कारवाई केल्यास संबंधितावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्याकरता या समितीची आखणी करण्यात आली आहे.
या मुद्द्यांवर झाली चर्चा
- भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार वि.दा.सावरकर यांना द्यावा अशा ठराव मांडला
- स्थानिक लोकांना उद्योगात ८० टक्के लोकांना प्राधान्य देण्याचा ठराव
- वीरमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांची नावं राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत यावी
- पक्षाविरोधी कारवाया होऊ नये म्हणून शिस्तभंग समितीची स्थापना
- निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचं पालन करण्याच्या मंत्र्यांना सूचना
- गडकिल्ल्यांचं संवर्धन होण्याकरता पुढाकार
- चर्चगेट स्थानकाला चिंतामणराव देशमुख नाव देण्याचा प्रस्ताव
- मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा
- राज्यातील तरुण वर्ग स्पर्धा परिक्षांकडे वळावेत याकरता ग्रामीण भागातील काना-कोपऱ्यात प्रशिक्षण वर्ग सुरू करणार
- बाळासाहेबांच्या विचारानुसार युती कोणासोबत करावी आणि कोणासोबत करू नयेत ही उद्दीष्ट पाळणार