जे गद्दार त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांचे गेम त्यांनी कसा केला हे सर्वांना माहित आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला, मात्र त्यात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे, दुसरं म्हणजे त्यांच्यासोबत गेलेले अपक्षांना कुठेही स्थान नाही, चांगलं काम करणाऱ्या महिलांना स्थान मिळाले नाही. मुंबईकरांना स्थान मिळाले नाही. ना मुंबईचा आवाज ऐकला ना महिलांचा आवाज ऐकला. ना अपक्षांचा कुठे त्यात आवाज आहे. त्यांच्यासोबत सर्वप्रथम १४-१५ जण जे निष्ठावंत गेले, त्यांनाही स्थान दिलं नाही. त्यामुळे पुन्हा दाखवून दिले की, निष्ठेला त्यांच्या मनात कुठेही स्थान नाही अशा शब्दात त्यांनी शिंदे फडणीस सरकारवर निशाणा साधला आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरु झाले, यावेळी विधीमंडळाबाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा बंडखोर नेत्यांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले मात्र त्यांच्यासमोर एक अट ठेवली आहे, आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या निष्ठावंतांना स्थान दिलं आहे त्यांनाही कमी लेखलं जात आहे. आमच्याकडे बरे होते असं झालं आहे. त्या नेत्यांशी संपर्क सतत असतो, मात्र तिथे जाऊन ते अडकले, फसले आहेत, नजरकैदेत आहेत. त्यांच्या मनात सतत विचार येत असतील की, आता आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत का?. त्यांना मी सांगू इच्छितो, दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. अशी अट आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना घातली आहे.
बिहारमध्ये जे नितीश कुमार यांना जमलं, ते उद्धव ठाकरेंना का जमलं नाही या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही 2019 मध्ये हे सत्तांतर दाखले, आम्ही देशाला पर्याय दिला होता. दुर्दैवाने आमच्यातूनच काही विश्वासघात करणारे गद्दार निघाले, ज्यांनी एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला. सगळं काही देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही ना महाराष्ट्राची, देशाची संस्कृती नाही. याला राजकारण मी मानत नाही, हे घाणेरडं राजकारण असून आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा तिसरा टप्पा आज रायगड दौऱ्यावर आहेत. आजच्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे अलिबाग आणि महाड येथे ‘शिव संवाद’ होणार आहे. आता या दौऱ्यामुळे आदित्य ठाकरे अधिवेशनाला पहिल्याच दिवशी लवकर बाहेर पडताना दिसले.