राज्यात सध्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद दिसू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, तरी हे सरकार घाबरत का? आपल्याच आमदारांना एवढं घाबरणार सरकार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीसांना यावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘थोडे दिवस थांबा. कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही याचं चित्र स्पष्ट होईल.’
नक्की काय म्हणाले अनिल परब?
‘अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार आहे हे अधिवेशनात ठरणार आहे. निवडणूक कशापद्धतीने होणार आहे हे पण ठरवणार आहे आणि आकडे देखील तुमच्या समोर येणार आहेत. ते आकडे आल्यानंतर आपल्या कळेल निवडणूक कशा पद्धतीने झाली, कोणी कोणाला मतदान केलं. आमचा आकडा कमी झाला की जास्त झाला, याच्यासाठी थोडे दिवस थांबा. कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही याच देखील चित्र स्पष्ट होईल,’ असं अनिल परब म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘अधिवेशनातील सर्व विषयाला आम्ही सामोर जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही आजही पूर्ण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यासाठी बैठक लावली आहे. सरकारला घाबरण्यासाठी काहीही कारण नाही आहे. सरकारने सर्व कामे केली आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही लोकांना ठासून सांगू.’
हेही वाचा – लोकांच्या प्रश्नांसाठी ४ आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे – फडणवीस