शिवसेनेच्या नेतेपदावरून रामदास कदम यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ते चांगलेच नाराज झाले आहेत. शिंदे गटाकडून त्यांची नेतेपदी पुनर्नियुक्ती झाली असली तरीही त्यांचा आज माध्यमांसमोर अश्रुंचा बांध फुटला. आम्ही कष्टाने उभी केलेली शिवसेना कोसळताना वाईट वाटतंय, असं ते म्हणाले होते. यावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. जे जे मिळालं ते आनंदाने भोगलं, मग आता टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला, अशा शब्दांत त्यांनी रामदास कदमांवर हल्ला चढवला. जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. (Shivsena leader Uddhav Thackeray replied to Ramas kadam)
हेही वाचा – …तर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदाराही आले नसते, रामदास कदमांचा दावा
ऑनलाई बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार आणि खासदारांना मी सुद्धा डांबून ठेवू शकलो असतो. पण त्याला लोकशाही म्हणत नाही. तुम्ही मनाने गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला कोंडू शकतो? त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. मी आजही कार्यकर्त्यांना भेटतो. त्यांनाही सांगितलंय, ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा, पण नाटकं करू नका. उगाचंच टीव्हीसमोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका. तुम्हाला ज्यावेळेला जे जे मिळालं ते ते तुम्ही आनंदाने भोगलं. शिवसेनेच्या विरोधात कारवायाही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करू नका.
ज्याला आपलं मानत होतो, तेच मुळावर घाव घालायला निघाले आहेत. ते एवढे सुडाने पेटले आहेत की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत. त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. मागितलं तर मी काहीही देतो. बाळासाहेबांचाही असाच स्वभाव होता. पण हिसकावून घेतलं तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – बाळासाहेबांची शिवसेना जगली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार, रामदास कदमांचा निर्धार
जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे. सहानुभूती आहे. शिवसेना वाढीसाठी याचा उपयोग करा. आपम ५० लाखांचा टप्पा पार केला की नोंदणीचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन या. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी दौरे करणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.