दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातच भाजपने यंदा मोठी दहिहंडी लावण्याची तयारी केली आहे. वरळीत शिवसेनेचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपने हे आयोजन केलंय, मात्र त्यांचा डाव यशस्वी होणार नाही. मुंबईत शिवसेनाच विजयी होईल. कुणी कितीही उलथापालथ केली तरी शिवसेनेचा गड मजबूत, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी भाजपला दिलं आहे.
सुनील शिंदे यांनी विधीमंडळाबाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शिंदे म्हणाले की, कुणी कितीही उलथापालथ केली तरी वरळीतली शिवसेना एवढी प्रचंड अभेद्य आहे. कोणतीही डाळ शिजणार नाही. मी तिथे लहानपणापासून शिवसेनेचं काम करतोय. हे सगळं बोलण्याचा मला अधिकार आहे. वरळीतली दहिहंडी ही शिवसेनेने सुरु केलेली प्रथा आणि परंपरा आहे, असं म्हणत शिंदेंनी भाजपला टोला लगावला आहे.
ज्या मैदानावर ही मंडळी दहिहंडी घेत आहेत, आम्ही तिथे कार्यक्रम घेत नाहीत, कारण स्थानिक लोकांनी सांगितलं होतं की, मैदानाचं सुशोभिकरण झालेलं आहे. म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. पण शिवसेनेचा तिकडचा गड मजबूत आहे. दहिहंडी आणि इतर गोष्टींचे कुणी स्वप्न पहात असतील तर ते स्वप्नच राहतील, असं सुनील शिंदे म्हणाले.
महानगरपालिका ही १०० टक्के शिवसेना जिंकणार आहे. मुंबई महापालिकेत विजयी होत असताना पुन्हा वरळीत शिवसेनेचे सगळेच नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
हेही वाचा : ‘त्या’ बोटीत तीन एके 47 गन आढळल्या; पोलीस अलर्ट मोडवर