शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर खासदारांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. यावेळी बैठकीत एनडीए उमेदवाराच्या पाठिंब्याबाबत खासदारांचं मत जाणून घेण्यात येणार आहे. तसेच या बैठकीमध्ये शिवसेनेचे १९ पैकी ७ खासदार अनुपस्थितीत आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि इतर खासदारांनी बैठकीला हजेरी लावली आहे. तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भावना गवळी, संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कलाबेन डेलकर आणि कृपाल तुमाणे, असे एकूण ७ खासदार अद्यापही बैठकीला अनुपस्थितीत आहेत.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र या बैठकीला आतापर्यंत लोकसभेच्या ७ खासदारांनी गैरहजेरी लावली आहे.
शिवसेनेचे उपस्थित खासदार –
गजानन कीर्तिकर
अरविंद सावंत
विनायक राऊत
हेमंत गोडसे
धैर्यशील माने
प्रताप जाधव
सदाशिव लोखंडे
राहुल शेवाळे
श्रीरंग बारणे
राजन विचारे
ओमराजे निंबाळकर
राजेंद्र गावीत
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांना घेऊन बंड पुकारले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, आता शिवसेनेत खासदार सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदारांचं वैयक्तिक मत जाणून घेणार आहेत. बैठक झाल्यानंतर ठाकरे खासदारांशी देखील वैयक्तिक चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : अनिल देशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला