गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज अखेर जामीन मिळाला आहे, 100 दिवसांनी पीएमपीएल कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 2 लाखांच्या जातमुचलक्यावर राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. यावर ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘टायगर इज बॅक’ हे नवं ट्विट केलं आहे. दरम्यान यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे यांना आनंदाअश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
‘यस टायगर इज बॅक..आमचे सेनापती परत आले आहे. तुम्ही फार वाघाला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केलात मात्र तुम्ही नाही कोंडून ठेऊ शकलात. कुठली कूटकारस्थान, कपटनिती, राजकारण, कुटीलनिती, सर्व स्वायत्त यंत्रणा हे सगळ निष्प्रभ ठरलं आहे. राऊतसाहेब परत आले, आमच्यासाठी आज दिवाळी आहे.’ अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांच्या डोळ्यातून आनंदाअश्रू वाहताना दिसले.
फॉल्टी असणारे लोक घाबरले
राऊतांचा जामीन हा शिवसेनेसाठी नवी ऊर्जा आहे की, ‘सत्य परेशान हो सकता है, पर पराजित नही’. हा विश्वास आहे की, ज्याला कर नाही त्याला डर असण्याची गरज नाही. यातून एक संदेश ध्वनीत होतोय की, जे गेले ते घाबरून गेले, फॉल्टी असणारे लोक घाबरले, राऊत फॉल्टी नव्हते, नाहीत आणि नसतील. काहीही झालं उद्या पुढे ईडी कोर्टात गेली तरी आमचा विश्वास आहे की, राऊत फ़ॉल्टी असू शकत नाहीत. राऊतांना जो त्रास झाला, स्वायत्त यंत्रणांनी त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला, हे सर्व पाहता राऊतांचा लढा आमच्यासाठी वस्तूपाठ आहे.