नाशिक : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन (दि. १५ ऑगस्ट) राज्यात सर्वत्र सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व स्थानिक यंत्रणांच्या प्रमुखांना ध्वजारोहणाच्या संहितेबाबत स्पष्ट सूचना केल्या आहेत.
राज्यात सर्व विभागीय किंवा जिल्हा किंवा उपविभागीय किंवा तालुका मुख्यालयात तसेच, ग्रामपंचायत मुख्यालयात ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करावा. विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करावेत. राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त तर, जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.
समारंभास उपस्थित राहणार्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. दिवसभरात वृक्षारोपण, आंतरशालेय किंवा आंतरमहाविद्यालय वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावीत. सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई करावी. एखाद्या विषयावर वेबिनार आयोजित करावे. देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतींबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.
स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडिलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे. नाशिकला विभागीय आयुक्त मुख्यालयात ध्वजारोहण सोहळ्याची व्यवस्था करणार असल्याने जिल्हाधिकार्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. तसेच, कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करु नये, असे निर्देशदेखील राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
खासगी कार्यालये व संस्थांना निर्देश
एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभरात एकाचवेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजेदरम्यान इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. ध्वजारोहण सोहळ्यात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल. याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विशद करणारा तसेच, उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा. संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गावप्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालयात ध्वजारोहण करतील.