सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध धार्मिक सण समारंभ उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र विविध ठिकाणी सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना घडत असल्याने याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज्यभरात सामाजिक आणि वैयक्तिक कारण आणि मागण्यांसाठी आंदोलने, निदर्शने होत आहे.मात्र आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अचानकपणे उपोषणे, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोकोसारखे आंदोलनात्मक घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा घटनांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी 8 मेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केला आहे. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व 37 (3) नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून 8 मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केले आहे, या काळात जिल्ह्यात कलम 37 (1) लागू असेल. त्यानुसार जिल्ह्यात शस्त्रे साठा, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या तसेच शारीरिक इजा करण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू बाळगणे, तसेच शरीरात इजा होतील अशा इतर कोणतीही वस्तू बाळगणे, सभ्यता, निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करण्याविरोधात कारवाई केली जाईल. जिल्ह्यात पाचहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास, जमाव करून मिरवणूक काढण्यास, सभा घेण्यास, मिरवणुकांना परवानगी देण्यांचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना असतील, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षा सुनावण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.