पालघरमधील केळवा समुद्रात ६ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एकाला वाचवण्यात यश आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. स्थानिक मच्छिमार बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहेत.
पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. पर्यटनासाठी जिल्ह्यात अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दीसुद्धा होताना दिसते. केळवा समुद्र किनाऱ्यावर दोन मुले पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागली त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ६ जण बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये दोन तरुणांचा समावेश आहे.
केळवा बीचवर दोन लहान मुले पोहण्यासाठी पाण्यात गेली होती. ओहोटी आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मुलं बुडू लागली. बचावासाठी प्रयत्न करत असल्याची बाब काही जणांच्या निदर्शनास आली. दोन मुलांना वाचवण्यासाठी चार जणांनी पाण्यात उडी मारली. परंतु या चार जणांमधील २ जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप २ जण बेपत्ता आहेत.
बेपत्ता असलेल्यांचा शोध स्थानिक मच्छिमार घेत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस स्थानिकांच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेत आहेत. दरम्यान बुडालेल्या चौघांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
हेही वाचा : Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना मोठा धक्का, ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ