मुंबईः राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया ही किचकट असते. या निवडणुकीसाठीचे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने होते. म्हणून आमच्या आमदारांचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या आमदारांना रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवले आहे, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सांगितले. संजय राऊतांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी गुप्त मतदानासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले, आपल्याकडे चुकीची माहिती आहे. खुल्लं मतदान आहे.
संजय राऊतांनी शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलंय? यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्यसभेसाठीची मतदान प्रक्रिया तांत्रिक असते. आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं. म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. भाजपाने काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीनेही तसंच केलं आहे. त्यामुळे थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं काय आहे? तुम्ही केलेलं चालतं? तुमचं गेट-टू-गेदर आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो. मूर्ख लोक आहेत ते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
शर्मांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागली
प्रेषित मोहम्मदांविषयी अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांना पक्षानं निलंबित केलं. त्यावरूनही शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी भाजपावर धर्माचं राजकारण अंगलट आल्याचा देखील आरोप केला. नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे पहिल्यांदाच देशाला माफी मागावी लागल्याचं संजय राऊत म्हणालेत. “जगभरात जे वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली. परदेशात याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. पहिल्यांदाच एखाद्या लहान देशाकडून मोठ्या देशाकडे माफी मागण्याचा आग्रह होतोय, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.
हेही वाचाः कोणालाही न घाबरता अन् जुमानता कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचं, मुख्यमंत्र्यांचे सेना आमदारांना आदेश