यंदा पंढरपूरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात पार पडली. दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लाखो भाविक आषाढीला पंढरपूरात दाखल झाले होते, दरम्यान आषाढीचा सोहळा पार पडल्यानंतर वारकऱ्यांनी आपापल्या गावी जायला प्रस्थान केले होते. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेली संत श्री गजानन महाराजांची पालखी दोन महिन्यानंतर आता शेगावात परतली आहे. बुधवारी ३ ऑगस्ट रोजी या पालखीचे शेगावात आगमन झाले. १३०० किमीचा पायी प्रवास करून श्री गजानन महाराजांची पालकी पुन्हा आपल्या गावी परतली आहे. यावेळी तेथील ग्रामस्थांनी तसेच लाखो भाविकांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने ६ जून रोजी आषाढी एकादशीसाठी शेगावमधून ७०० वारकऱ्यांसह प्रस्थान केले होते. पंढरपुरात आषाढी साजरी करून १३ जुलै रोजी शेगावच्या दिशेने प्रवास सुरू केला. १३०० किमीता पायी प्रवास करत बुधवारी पालखी शेगावात परतली. यावेळी तेथील ग्रामस्थांनी तसेच लाखो भाविकांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
यंदा श्रींच्या पालखीचे हे ५३ वे वर्ष होते. यावेळी वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगाच्या गजरात श्री गजानन महाराजांचे आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष केला.