दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता परीक्षा केंद्रावर उशीरा पोहोचल्या परीक्षेला मुकावे लागणार आहे. याबाबत बोर्डाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये असे आदेश केंद्रांना दिले आहे. (SSC HSC Exam 2023 Students Will Not Get Permission In Exam Center)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे. येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. मात्र, या परीक्षेपूर्वी बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गतवर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पेपरला मुकावे लागू शकते.
दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी 10:30 तर दुपारी 02:30 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.
हेही वाचा – नवीन पायंडे पाडू नये; पुणे पोलिसांच्या ‘त्या’ मास्टर प्लॅनवर अजित पवारांची प्रतिक्रिया