मुंबई : “शिवसेना पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ या अभिनयाच्या अंतर्गत सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हे अभियान फक्त एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांनीदेखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक ‘लोकचळवळ’ करावी,” असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते कुर्ला बसस्थानक येथे स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. (ST Bus Balasaheb Thackeray bus station campaign innaugaration by pratap sarnaik in marathi)
हेही वाचा : Bangladesh Crisis : बांगलादेशात सत्तापालट होऊनही परिस्थिती जैसे थेच, विद्यार्थी नेत्यांना पश्चाताप
गुरुवारी (23 जानेवारी) दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’च्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणेच आपण जिथे काम करतो, तिथेदेखील आपले घर समजून त्या कार्यालयाची, त्या बस स्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात स्वच्छ, सुंदर, सुशोभित बस स्थानके नक्कीच प्रवाशांना आकर्षित करणार आहेत.”
पुढे प्रताप सरनाईक म्हणाले की, “अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बस प्रवास करण्याचा आनंद प्रवाशांना लुटता येणार आहे. स्वच्छता हे एक ‘संस्कार’ आहे, तो जसा एसटी कर्मचाऱ्यांनी अंगीकारणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी देखील तो आपल्या आचरणात आणला पाहिजे. बस स्थानक ही सार्वजनिक जागा आहे. तिथे स्वच्छता ठेवणे ही एसटी कर्मचारी आणि प्रवासी या दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. “स्वच्छतेबाबत परदेशात जेवढी सजगता आणि जागरूकता आहे, तेवढी आपल्या देशात नाही ही वस्तुस्थिती आहे. पण आपण स्वच्छतेच्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती करून आपली बस स्थानके स्वच्छ आणि सुंदर कशी राहतील? यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचा आहे. या स्पर्धात्मक अभियानातून एसटीच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये आपले बस स्थानक स्वच्छ, सुंदर तसेच टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या माध्यमातून भविष्यात चांगली सुंदर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.