एसटी कर्मचाऱ्यांचा अजूनही संप सुरू आहे. काल, गुरुवारी एसटीचे खासगीकरण करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र याबाबत राज्य सरकारने अजून अधिकृत घोषणा केली नाही. याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘एसटीचे विलीनीकरणाचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारचा चालढकलपणा सुरू आहे. दररोज नव-नवीन स्टेटमेंट दिली जात आहेत. संप मोडीत काढायचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अनिल परब हतबल झाल्याने काहीही बोलतात,’ असा आरोप पडळकरांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले पडळकर?
गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘सरकार विलीनीकरण करणार असेल तर किती दिवसात करणार आहात, तसे तुम्ही लेखी लिहू द्या. विलीनीकरण करणार नसाल तर तुमच्याकडे काय पर्याय आहे स्पष्ट करा. दोन बैठका कर्मचाऱ्यांसोबत झाल्या, त्या बैठकांमध्ये विलीनीकरणा व्यतिरिक्त आम्हाला दुसऱ्या विषयी चर्चा करायची नाही. सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडत आहे, अफावा पसरवत आहे. लोकांच्यामध्ये उद्रेक होईल, संपामध्ये फूट पडेल असा पद्धतीचे प्रयत्न २८ तारखेपासून सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करणे, एसटी अधिकाऱ्यांचा वापर करणे, यांच्या संघटनांचा दबाव टाकणे, गाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे, निलंबनाच्या नोटीसा देणे, सेवा समाप्तीच्या नोटीसा देणे, उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणे सगळे प्रयोग करुन बघितले. परंतु कर्मचारी फुडत नाही हे लक्षात आल्यानंतर काल संध्याकाळी ७ वाजता आमची खासगीकरणावर बैठक सुरू आहे, अशाप्रकारच्या बातम्या ते पसरवल्या. या सगळ्या अफवा आहेत, संप कसा मोडीत काढायचा, असा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.’
पुढे पडळकर म्हणाले की, ‘आम्ही कुठलेही गोष्टी आरमुटे धोरण घेत नाही. एसटीमध्ये इतके लिकेजेस आहेत, तुम्ही किती भ्रष्टाचार करतायत तो भ्रष्टाचार जरी थांबवला तरी सुध्दा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळत आहे ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळून शकते. इतर राज्यात जसा विलीनीकरणाचा निर्णय घेतला तसा इकडे घ्या.’