रेमिडिसीव्हर सारख्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकावीत आणि ही औषधे कोरोना रुग्णांना कमीत कमी किमतीत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध घालण्याबरोबरच यावरची औषधे , उपचार गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करणे ही सरकारची जबाबदारी आहे.राज्यात रेमिडिसीव्हर सारख्या औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकणे आवश्यक आहे, असे भांडारी म्हणाले.