राज्य सरकारने कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरने कोरोना चाचणीसाठी ४५०० हे शुल्क निश्चित केलं होतं. त्यानंतर हा दर रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार महाविकास आघाडी सरकारने कोरोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे खासगी लॅबला दणका बसला आहे. मात्र, या निर्णयाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळला आहे.
आयसीएमआरने सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनो हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले हे समितीचे सदस्य आहेत. या समितीने कोरोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता.
Maharashtra Government caps maximum price for #COVID19 tests (RT-PCR) at Rs 2200, the earlier price was 4400. Maximum price for the test by collecting samples from home capped at Rs 2800. pic.twitter.com/l1TsEIs6ij
— ANI (@ANI) June 13, 2020
या अहवालानंतर राज्य सरकारने दर निश्चित केले आहेत. “खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या शुल्कात सरकारने कपात केली आहे. पूर्वी कोरोना चाचणीसाठी ४५०० रुपये आकारले जात होते, मात्र आता २२०० रुपये आकारले जातील. कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा – भाजप आरक्षणाच्या बाजूने – जेपी नड्डा
“व्हीटीएमच्या माध्यमातून रुग्णालयामधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क आकारलं जाईल. पूर्वी रुग्णालयामध्ये कोरोनाची चाचणी केली तर ४५०० शुल्क आकारलं जात होतं. तर घरी जाऊन चाचणी केल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं,” असं टोपे यांनी सांगितलं.