राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने विविध निर्बंध घातले आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे सरकारवर टीका होत आहे. राज्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस निर्बंध लावले जातील असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, सातही दिवस शंभर टक्के लॉकडाऊन असल्याचे चित्र असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु, हे निर्बंध लादले कारण लोकांचा जीव महत्वाचा आहे, असे विधान सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसेच निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार केला जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
जीव वाचवण्याला प्राधान्य
राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, दुकाने बंद आहेत हे मान्य. मात्र, जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार केला जाईल, असे टोपे म्हणाले.
निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा प्रयत्न
आमच्यापुढे लोक येतात आणि काही मागणी करतात. त्यांची मागणी रास्त आहे असे वाटले तर आम्ही नक्कीच निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा विचार करू. जिथे जागा मोठी आणि काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे, गर्दी होणार नाही, अशी दुकाने सुरु ठेवण्यासाठी सरकारचा आक्षेप असेल असे मला वाटत नाही. परंतु, जिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, तिथे निर्बंधांमध्ये शिथिलता येणे शक्य नाही, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले. आम्ही लोकांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि जिथे शक्य असेल, तिथे निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचा प्रयत्न करू, असेही शेख यांनी सांगितले.