मुंबई: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांना 12 वीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. याचा मोठा फायदा या विद्यार्थ्यांना होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत जुलै- ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी 28 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. (Students who have passed the 12th supplementary examination will get admission this year only Order of Chandrakant Patil)
बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेला 68 हजार 909 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 22 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील पदवीच्या अभ्यासक्रमाच्या रिक्त जागेवर प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
चंद्रकात पाटील यांचा आदेश काय?
पुरवणी परीक्षेत उत्तीरण झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांतर्गत संलग्नित महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम आणि पारंपारिक अभ्यासक्रमाकरता (वाणिज्य, कला , विज्ञान) प्रवेश दिला जावा. या प्रकरणी कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
अजित दादांवर चंद्रकांत पाटील नाराज
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.पुणे शहराच्या कारभाराची सूत्रं ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असली, तरी अजित पवार यांनी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करून बैठकांवर बैठकांचं आयोजन केलं आहे. तसंच, याचसंबंधी चंद्रकांत पाटील यांन पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे.
(हेही वाचा: पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव- अतुल लोंढे )