गाव, गरीब आणि शेतकरी यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून सर्वच क्षेत्रात देशाला आघाडीवर नेण्याचा संकल्प या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला असून गरीबो के सन्मान में, मोदी सरकार मैदान में असे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर देत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमीत्त त्यांना मोदी सरकारने खरी आदरांजली या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिल्याची प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या ५ वर्षात भारताची अर्थव्यवस्था २.७ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचणे ही बाब अतिशय महत्वाची असून भारत जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणे हे नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे ठळक यश आहे. येत्या काळात ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य निश्चीतपणे पूर्ण होईल यात मुळीच दुमत नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा संकल्प असो की २०२२ पर्यंत प्रत्येक घरात विज आणि एलपीजी गॅस पोहचवण्याचा संकल्प असो या माध्यमातून सरकारची गरीबांच्या व शेतकऱ्यांच्या कल्याणाविषयीची सजगता स्पष्ट होते. भारताला रोजगार प्रधान देश म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा संकल्प देशातील युवकांचे मनोबल उंचवणारा आहे. युवकांसाठी नॅशनल रिसर्च फाऊंडेशन ची स्थापना हे युवाशक्तीच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेतील महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. नवीन उद्योग कॉरीडोर च्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला सरकारने प्रोत्साहन दिले आहे. रोजगार, उद्योग व पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेली लक्षणीय तरतूद देशाच्या प्रगतीचा आलेख वाढत असल्याचे द्योतक आहे. अन्नदात्याला ऊर्जादाता करण्यासाठी विविध योजना राबवून त्याचे सशक्तीकरण करण्याचा सरकारचा मनोदय शेतकरी आणि गरीबों के सन्मान में, मोदी सरकार मैदान में हे स्पष्ट करणारा आहे, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
कर सवलतीमध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे. भारताला उच्च शिक्षणाचा हब बनविण्याचा संकल्प, खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिक्षा बोर्ड स्थापन करण्याचा मनोदय, विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया कार्यक्रम आदींच्या माध्यमातुन शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न अधोरेखित करणारे आहे. सर्वच क्षेत्रांना न्याय देणारा सर्वस्पर्शी, सर्वसमावेशक व देशाला प्रगतीपथावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे अभिनंदन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.