कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा राजाराम सहकारी साखर कारखान्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. साखर आयुक्तांनी या कारखान्यातील 1272 सदस्य अपात्र ठरवले असून यामधील कोल्हापुरातील नावाजलेले राजकारणी महाडिक यांच्या कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता महाडिक गटाला जोरदार धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील अन्य काही लोकांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी अपात्र सदस्यांच्या संदर्भातील याचिका दाखल केली होती. त्यानुसार साखर आयुक्तांनी याबाबतचा निर्णय घेत तब्बल 1272 सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : Raj Thackeray : हिंदू सणांवर बंदी आणू देणार नाही, ठाण्यातील दहीहंडीमध्ये राज ठाकरेंची गरजले
मार्च आणि एप्रिल 2023 या महिन्यात कोल्हापुरातील राजाराम सहकारी कारखान्याची निवडणूक पार पडली होती. ज्या निवडणुकीच्या आधीच बोगस सभासदांच्याबाबतचा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या सभासदांची नावे कमी करावी, अशी मागणी करत सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. पण त्यानंतरही निवडणूक घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. ज्यानंतर या निवडणुकीत महाडिक गटाने बाजी मारत साखर कारखान्यावर 28 वर्षांपासून असलेली सत्ता कायम ठेवली.
साखर आयुक्तांनी महाडिक गटातील 1272 सदस्य अपात्र असल्याचा निर्णय दिल्यानंतर याबाबत सतेज पाटील यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये कारखान्याची निवडणूक झाली. यामध्ये कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून आमच्या आघाडीच्या इच्छूक उमेदवारांपैकी 30 उमेदवारांचे अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवून आमचे 30 तगडे उमेदवार निवडणूक रिंगणाबाहेर घालविले. तरीसुद्धा सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण 12,336 इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित 11,000 सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी 5000 ते 5500 मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिद्ध झाले आहे. या अपात्र सभासदांच्यामुळे आमच्या उमेदवारांना 1200 ते 1250 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे.