अहिल्यानगर : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री पद घेत या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बीड गुन्हेगारीमुक्त होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, आता भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बीडचा उल्लेख करत अहिल्यानगर जिल्ह्याबाबत एक मोठे विधान केले आहे. आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असे विधान सुजय विखेंनी केल्याने यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगलेल्या आहेत. (Sujay Vikhe Patil claim that voters saved Ahilyanagar from being beed)
अहिल्यानगरमधील अकोळनेर येथे आमदार शिवाजी कर्डिले, काशीनाथ दाते, संग्राम जगताप यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. तसेच ‘खेळ पैठणी’चा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला सुजय विखे उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सुरुवातीला बीडचा उल्लेख करत म्हणाले की, विधानसभेची निवडणूक महत्त्वाची होती. आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते. तीन महिन्यांत मस्साजोगसारखी घटना घडली असती. मतदारांनी अहिल्यानगरला बीड होण्यापासून वाचवले. पण त्यांनी केलेले हे विधान नेमके कोणासाठी होते? असा महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मला जरी नाकारले असले तरी अहिल्यानगर तालुक्याला पाणी द्यायच्या जबाबदारीचे खाते हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना मिळाले आहे. पुढील निवडणुकीत पाणी देणाऱ्यालाच मतदान केले पाहिजे अशी प्रत्येकाने भूमिका ठेवली पाहिजे. कर्डिले, दाते, पाचपुते यांच्या सहकार्याने शब्द देतो की, अडीच वर्षांच्या काळात साकळाई पाणी अकोळनेर गावात आणल्याशिवाय परत येणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी उपस्थित लोकांना दिले.