महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहेत. ही निवडणूक आगामी महिन्यातील १० डिसेंबर रोजी होणार आहे. शिवसेनेतून विधान परिषदेसाठी शिवसेनेचे नेते सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामदास कदम यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, रामदास कदम यांच्यावर पक्षनेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनील शिंदे यांना शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागं सोडणं ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी टीव्ही ९ या वृत्त वाहिनीला दिली आहे.
संपूर्ण यशाचं श्रेय हे ठाकरे कुटुंबाला जातं अशा प्रकारची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सुनील शिंदे यांनी दिली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागं सोडणं ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. तसेच मिळालेल्या संधीचं सोनं मी करणार असं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांचे मी सर्वात पहिले मनापासून आभार मानतो
शिवसेनेने विधानपरिषदेच्या जागेसाठी माजी आमदार सुनील शिंदे यांना उमदेवारी दिलेली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मी सर्वात पहिले मनापासून आभार मानतो. कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला. ही एक आमच्याकरिता सन्मानाची बाब होती. तसेच संपूर्ण शिवसेनेकरीता आनंदाची बाब होती. मी माझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्दमध्ये महापालिका, विधानसभा पाहिली. परंतु आता वरिष्ठांची विधानपरिषद बघण्याची मला संधी मिळतेय. त्यासाठी मी संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचा मनापासून आभारी आहे.
रामदास कदम यांच्या नावाला पूर्णविराम
पक्षप्रमुख जे काही निर्णय घेतील ते अंतिम निर्णय असतो. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय़ घेतला आहे. तो निर्णय पूर्णपणे विचारविनिमय करून घेतला आहे. असं वक्तव्य सुनील शिंदे यांनी केलं आहे.
सुनिल शिंदे यांची राजकीय कारकीर्द
शिवसैनिक ते आमदार असा सुनिल शिंदे यांचा प्रवास आहे. २००७ मध्ये मंबई महापालिकेत ते निवडून आले होते. त्यानंतर बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये वरळी मतदार संघातून त्यांचा विजय झाला होता. त्यावेळी सचिन अहिर यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. २०१५ मध्ये उत्तर अहमदनगर संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी पदाची जबाबदारी सांभाळली होती. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी वरळीची जागा सोडली होती.
हेही वाचा: Farm Laws: महाभारत आणि रामायणात शेवटी अहंकाराचाच पराभव, शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
सुनील शिंदे यांनाच उमेदवारी का?
शिवसेनेचे नेते सुनील शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. तसेच रामदास कदम सुद्धा कडवट शिवसैनिक आहेत. परंतु आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी वरळी मतदार संघातून जागा सोडली होती. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचं देखील नेतृत्व केलं आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्यागाचं स्मरण ठेवलं आणि संपूर्ण विचारविनिमय करून पक्षप्रमुखांनी त्यांना उमदेवारीसाठी संधी दिली. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिली होती.