राफेल प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत असताना सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात पक्षाची बाजू ठामपणे मांडली. पक्षावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देणे असो किंवा संघटनेला बळ देण्यासाठी लोकांमध्ये जाणे असो… सुप्रिया सुळे दोन्ही आघाड्यावर लढताना दिसत आहेत. आज त्या कोपरगाव तालुक्यात व्यापारी, डॉक्टर, इंजिनिअर आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत असताना अचानक सभागृहातील वीज गेली. तरीही सुप्रिया सुळे यांनी बैठक सुरू ठेवली आणि उपस्थितांचे निवेदने स्वीकारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मोबाइलच्या बॅटरीने अंधार दूर करत सुप्रिया सुळे यांनी बैठक सुरु ठेवली. मात्र त्यांचे हे प्रयत्न पक्षाला अंधारातून बाहेर काढणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वाचा – सत्ताधाऱ्यांना शंभर खून माफ; राम कदम, संभाजी भिडे प्रकरणावर सुप्रिया सुळेंचे टिकास्त्र
खा. @supriya_sule यांच्या कोपरगाव येथे विविध समाजवर्गांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील वीज खेळखंडोब्याची प्रचिती आली. पण वीज नसतानाही शिक्षक आणि व्यापारी वर्गाने चर्चा सुरू ठेवत आपल्या मागण्या खा.सुळे यांच्यासमोर मांडल्या. pic.twitter.com/ES8HKG07An
— NCP (@NCPspeaks) October 4, 2018
खासदार सुप्रिया सुळे या २ ते ५ ऑक्टोबरपर्यंत अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विधानसभानिहाय कार्यकर्ता मेळावे, विद्यार्थी, शेतकरी आणि विविध समाजघटकांशी त्या संवाद साधणार आहेत. आतापर्यंत या दौऱ्यात त्यांनी सरकारवर चौफेर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पक्षातील इतर नेत्यांवर विविध आरोप झाले असल्याकारणाने त्यांच्याकडून सरकारवर हातचं राखून टीका होताना दिसते. मात्र सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना नेहमी दिसतात.
१) राफेलच्या सौद्यामध्ये विमानांची किंमत ३०० टक्क्यांनी म्हणजे ५२६ कोटी रुपयांपासून ते १६७० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली याचं समर्थन होऊ शकत नाही. याचा देशाच्या तिजोरीवर मोठा बोजा पडेल.
— Supriya Sule (@supriya_sule) September 28, 2018
३) एकेकाळी भाजपने बोफोर्स प्रकरणी किंमत आणि त्यातील तपशीलाबाबत आक्षेप घेऊन आरोप केले होते. आता जेंव्हा त्यांच्यावर ही वेळ आली तेंव्हा ते गोपनियतेच्या कराराच्या आड का लपत आहेत. त्यांनी किंमत आणि तपशील जाहीर करायला पाहिजेत.
— Supriya Sule (@supriya_sule) September 28, 2018
मी मुख्यमंत्री असते तर राम कदमचा…
“सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात की, पसंत असलेली मुलगी दाखवा मी उचलून आणतो. असे बोलायची हिंमत कशी होते? हा महाराष्ट्र कुठे चाललाय? अशा आक्षेपार्ह वक्तव्यावरही मुख्यमंत्र्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तात्काळ राम कदम यांचा राजीनामा घेतला असता, हातातून सत्ता गेली तरी बेहत्तर पण महिलांचा मानसन्मान महत्त्वाचा आहे”, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी कोपरगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात केला. आघाडी सरकारच्या काळात महिलांचा मान राखला गेला, स्व. आर. आर. आबा यांच्या निर्णयामुळे आज महीला पोलीस महाराष्ट्रात दिसत आहेत, मुलींना समान अधिकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतलाय, याचा अभिमान आपल्याला असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले.